गुढीपाडव्याच्या नंतर भूमिका स्पष्ट करणार
रणजीत देसाई यांचे सूचक वक्तव्य
राजकीय वर्तुळात खळबळ
कुडाळ : गेले तीन महिने मी सायलेंट मोडवर होतो. मला योग्य व्यासपीठ मिळाले नाही. मी योग्य व्यासपीठाच्या प्रतीक्षेत आहे; मात्र गुढीपाडव्याच्या नंतर माझी भूमिका स्पष्ट करणार,असे सांगत माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य रणजित देसाई यांनी आपल्या सायलेंट मोडवरील भूमिकेबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे.
कुडाळ तालुका पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रम कुडाळ एमआयडीसी येथील बॅरिस्टर नाथ पै. शिक्षण संस्था येथे पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री.देसाई यांनी सूचक वक्तव्य करत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणले.
गेले काही महिने सार्वजनिक मंचांपासून दूर राहिलेल्या देसाई यांनी मी शांत होतो म्हणजे निष्क्रिय नव्हतो, असा सूचक इशाराही दिला. योग्य वेळी आणि योग्य व्यासपीठावरच आपली भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुढीपाडव्यानंतर पुढील दिशा जाहीर करण्याचे संकेत त्यांनी दिल्याने तालुक्यात उत्सुकता वाढली आहे.
या कार्यक्रमाला ज़िल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबूडकर, ज़िल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, ज़िल्हा पत्रकार संगाचे अध्यक्ष उमेश तोरसकर आदिसह तालुक्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पत्रकारांच्या कार्याचा गौरव करतानाच देसाई यांनी माध्यमांच्या जबाबदारीचेही महत्त्व अधोरेखित केले.


Subscribe










