पक्षात राहून नेत्यांमध्ये वाद निर्माण करणाऱ्यांना पक्षात स्थान नाही
मनीष दळवी यांचा प्रमोद जठार यांना घरचा आहेर
सावंतवाडी प्रतिनिधी: भाजप नेते तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी कणकवली झालेल्या पत्रकार परिषद विशाल परब उभे राहिल्यामुळे केसरकर यांचा विजय झाल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर आज मनीष दळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन जठार यांचा दावा खोडून काढला.विशाल परब यांचे गोडवे मा.आ.जठार यांनी गाऊ नयेत यावेळी बोलताना मनीष दळवी म्हणाले,भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यामुळे दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजय झाला. त्यामुळे माजी आमदार प्रमोद जठार यांनी विशाल परब यांचे गोडवे गाऊ नये तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक करावे, असा खोचक टोला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिला आहे.
पक्षात राहून नेत्यांमध्ये वाद निर्माण करणाऱ्यांना पक्षात स्थान नाही
दरम्यान ज्या व्यक्तीने पक्षात राहून नेत्यांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला. त्यांना यापुढे पक्षात स्थान देणार नाही. निवडणूक संपली असली तरी युद्ध संपले नाही तर ते आता सुरू झाले आहे, अशा तिखट शब्दात त्यांनी अपक्ष उमेदवार विशाल परब यांना इशारा दिला. यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग, महेश धुरी, बाळू शिरसाट, राजन राऊळ, अशोक सावंत, मधुकर देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.
केसरकरांच्या विजयात भाजपा कार्यकर्त्यांचा मोठा वाटा
मनीष दळवी पुढे म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार केसरकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. या विजयात भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्तांचे मोठे योगदान होते. त्यामुळे भाजपच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना धन्यवाद देतो. यावेळच्या निवडणूकीकडे सगळ्यांचे बारकाईने लक्ष होते. काही शक्ती या ठिकाणी वावरत हो महायुतीच्या उमेदवाराचा पराभव त्यांना करायचा होता.
पक्षाला, राणे व चव्हाण यांना मानणारा कार्यकर्ता महायुतीच्या सोबत राहिला
दळवी पुढे म्हणाले,मात्र, खास. नारायण राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी आदेश दिले. काहीजण सवयीप्रमाणे पक्ष सोडून गेले, बंडखोरी केली. त्यामुळे कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी चव्हाण यांना चार वेळा इथे यावे लागले. नारायण राणे यांनी दौरा करत आपली भूमिका कार्यकर्त्यांना सांगितली. काहींनी पक्षाशी गद्दारी करत उमेदवारी दाखल केली. ऑडिओ क्लिप व्हायरल करत वातावरण बिघडण्याचे काम केले. मात्र, पक्षाला, राणे व चव्हाण यांना मानणारा कार्यकर्ता महायुतीच्या सोबत राहिला असे मत त्यांनी व्यक्त केल.मात्र जठार यांनी जे विधान केलं ते चूकीच होत रक्ताच पाणी करणाऱ्या भाजपच्या पर्यायाने महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळे केसरकर यांचा विजय झाला आहे. त्यामुळेच जठार यांनी या मतदारसंघात यावे व निवडणूकीत रक्ताच पाणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटावे आणि नंतर कोणाचे गोडवे गायचे असतील तर गावे, असा सल्ला दळवी यांनी दिला.
इथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याशिवाय अशी विधानं करू नयेत
हा विजय महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मेहनतीचा आहे. या ठिकाणी गद्दारी, बंडखोरीमुळे कोणाचा फायदा झाला नाही. विरोधकांची मते एक केली तरीही केसरकरांरपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे नेत्यांनी अशी विधानं करून भाजपच्या कार्यकर्त्यांचा त्यांच्या कष्टाचा अवमान करू नये. इथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याशिवाय अशी विधानं करू नयेत असे खडे बोल यावेळी दळवी यांनी जठार यांना सुनावले .