ठाकरे सेनेच्या कोकणातील बड्या नेत्याचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत…

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोकणातील फायरब्रँड नेते आमदार भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यांनी याबाबत रविवारी वक्तव्य केलं असून यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

राजकारणातील अनेक चढउतार पाहिलेले भास्कर जाधव यांनी वेगवेगळ्या आठ निवडणुका जिंकल्या आहेत. आता त्यांना पुढेही संधी असतानाच त्यांनी आता कुठेतरी थांबावसं वाटतयं, असं वक्तव्य केलं आहे. तसेच जर आपल्याला ‘संधी मिळत नसेल तर बाजूला व्हावे’, सध्याची स्थिती हेच सुचवू पाहत नाही ना? असेही मिश्किल वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. भास्कर जाधव कोकणातले नेते असून त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक वर्षे काम केलं. त्यांना मंत्रिपद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद देऊन शरद पवारांनी संधीही दिली. मात्र त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान युती सरकार आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. त्यांना अपेक्षा असूनही ती देण्यात आली नाही. याचीच त्यांच्या मनात आजही सल आहे. तसेच आताही विरोधी पक्षनेते पदाची मागणी करूनही महायुतीने त्यांच्या नावावर फुली मारली. यामुळे त्यांनी आपली नाराजी उघड उघड बोलून दाखवली. ज्याची चर्चा आजही होत आहे. अशातच त्यांनी आता आपल्या निवृत्तीचे संकेत देणारे विधान करून खळबळ उडवून दिली आहे. यावेळी भास्कर जाधव यांनी शिवसेनेची खरी ताकद ही शाखाप्रमुख आहे आणि तोच सध्या प्रवाहातून बाहेर असल्याची खंत व्यक्त करत शाखाप्रमुखांची फळी मजबूत करायली हवी, शिवसैनिकांना पुन्हा चार्ज केले पाहिजे, असे मत व्यक्त केलं आहे.

मला मंत्रीपद का दिलं नाही? याचं कारण कोणाकडे असेल तर त्यांनी द्यावं. पण मला ते मिळाले नाही, म्हणून मी काही रडत बसलो नाही. मी लढलो आणि आजही लढतोय. आतापर्यंत वेगवेगळ्या आठ निवडणुका लढल्या जिंकल्या. पण आता कुठेतरी थांबावसं वाटतं, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. त्यांच्या याच वक्तव्याकडे आता निवृत्तीचे संकेत म्हणून पाहिले जातेय. पण याचवेळी त्यांनी शिवसेना कोकणात टिकवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे असेही म्हटलं आहे. जाधव यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणातील मतदारसंघ ढवळून काढले पाहिजेत. मी स्वस्थ बसू नये अशी पक्षातल्या सर्वांची भावना असून कोकणापासून पालघरपर्यंत काम करावे, असेच अनेकांना वाटतं असल्याचे भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.

error: Content is protected !!