फार्मर आयडी कार्डची अट काही काळ शिथिल करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी कृषी आयुक्तांकडे केला पत्रव्यवहार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाच्या मागणीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

         कृषीयांत्रिकीकरणा अंतर्गत लॉटरी पद्धतीने  शेतकऱ्यांना कृषी अवजारांचे, ठिबक सिंचनचे वाटप केले जात आहे. मात्र त्यात अडथळा ठरत असलेली  फार्मर आयडी कार्डची अट काही काळ शिथिल करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन फार्मर आयडी कार्डची अट काही काळ शिथिल करण्याची कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी  पुणे कृषी आयुक्तालय येथील कृषी आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे.
       कृषीयांत्रिकीकरणा अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी अवजारांचे, ठिबक सिंचनचे वाटप लॉटरी पद्धतीने केले जात आहे. मात्र त्यात निवड झालेल्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्डची अट ठेवण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी दोन महिन्यापूर्वी फार्मर आयडी कार्ड काढूनही अद्याप त्यांना फार्मर आयडीकार्ड मिळालेले नाही. आता शेतीचा हंगाम सुरु झाल्यामुळे लॉटरी पद्धतीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्डची अट काही काळ शिथिल करून कृषी अवजारांचे वाटप करण्यात यावे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी कृषी अवजारांसाठी अर्ज केले आहेत त्या सर्वांना कृषी अवजारे मिळण्यासाठी कृषीयांत्रिकीकरण योजनेची व्याप्ती वाढवावी. अशी मागणी  माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली,माजी आमदार परशुराम उपरकर, कणकवली विधानसभा प्रमुख  सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी ४ जून रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली होती. त्या मागणीवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कृषी आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे.      
          जिल्हाधिकारी यांनी पत्रात म्हटले आहे कि, महाडीबीटी संगणक प्रणालीवरील प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PMKSY), वैयक्तिक शेततळे योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान (SMAM), एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) इ. योजनेतून निवड झालेल्या शेतकऱ्यांना महा. डी. बी. टी. पोर्टलवर लॉगीन करण्यासाठी फार्मर आयडीचा वापर सुरु झालेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी राजन तेली माजी आमदार, परशुराम उपरकर माजी आमदार, वैभव नाईक माजी आमदार, सुशांत नाईक जिल्हाप्रमुख युवासेना आणि  सतीश सावंत कणकवली विधानसभा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी याबाबत निवेदन दिलेले असून  अनेक शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळालेला नसल्याचे नमूद केले आहे. आता खरीप हंगाम सुरु झाला असल्यामुळे निवड झालेल्या शेतकऱ्यांना महा. डी. बी. टी. पोर्टलवर लॉगीन करण्यासाठी फार्मर आयडी वापराची अट काही काळासाठी शिथिल करून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देणेबाबत कळविलेले आहे. तरी कृपया याबाबत उचित कार्यवाही होण्यासाठी विनंती आहे असे पत्रात म्हटले आहे.
error: Content is protected !!