दोन गोठे जळून खाक
वैभववाडी : सोनाली वाणीवाडी येथे लागलेल्या आगीत दोन गोठे जळून खाक झाले आहेत. यात पांडुरंग बोभाटे व रुपेश बोभाटे या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एका गोठ्यात असलेली २५ गुरे मात्र बालबाल बचावली आहेत. मात्र गोठ्याच्या पडवीत असलेल्या १५ कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. ही घटना रविवारी दु. २ वा. च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळतात वाभवे वैभववाडी नगरपंचायतचा अग्निशमन बंब घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण आणले आहे.
सोनाळळी वाणीवाडी येथे पांडुरंग बोभाटे व रुपेश बोभाटे यांचा चिरेबंदी गोठा होता. आज दुपारी अचानक गोठ्याला आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. या आगीत लाकडी वासे व कौले जमीनदोस्त झाली. तर गोठ्यात असलेले गवत जळून गेले आहे. आग लागल्याची समजतात बोभाटे यांनी एका गोठ्यात असलेली गुरे बाहेर सोडली. त्यामुळे ती बचावली आहेत. गोठ्यात बोभाटे यांच्या कोंबड्या होत्या. त्या मात्र मृत्युमुखी पडल्या आहेत. गुरांची वैरण, कोंबड्यांचे खाद्य, खत गोठ्यात होते. ते देखील जळून गेले आहेत. गावातील स्थानिकांनी आग विझवण्याचा शर्तीचे प्रयत्न केले. अखेर अग्निशमन दल व स्थानिक ग्रामस्थ यांनी आगीवर नियंत्रण आणले. मात्र या दुर्घटनेत दोन्ही शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
यावेळी सरपंच भीमराव भोसले, माजी सभापती अरविंद रावराणे, प्रकाश शेलार, पोलीस पाटील राजेंद्र रावराणे, तलाठी कडुलकर आदी उपस्थित होत्या. अग्निशमन बंब सोबत नगरपंचायतचे सचिन माइणकर, सुनील निकम, संदीप भोसले आदी उपस्थित होते. या दोन्ही गरीब शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता केली जात आहे.













