आचरा येथील कोळंबी प्रकल्पावर अज्ञाताकडून विषप्रयोग

सुमारे १८ लाखांची कोळंबी गतप्राण

आचरा : आचरा- पारवाडी- डोंगरेवाडी लगत सुरू असलेल्या कोळंबी प्रकल्पात अज्ञाताने विषारी पदार्थ टाकून विषप्रयोग केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात सुमारे १८ लाख किंमतीची कोळंबी गतप्राण झाली आहे. याबाबतची फिर्याद आचरा पोलीस ठाण्यात प्रकल्पाचे मॅनेजिंग डायरेक्टर अपूर्व अंतोन फर्नाडीस, रा. धुरीवाडा मालवण यांनी दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाता विरोधात विविध कलमान्वये विषारी पदार्थ टाकून मानवी जीवितास दुखापत उत्पन्न होईल अशी कृती करून कोळंबी प्रकल्पातील कोळंबीचे नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १३ मे ला रात्री ११ ते ११ दरम्यान घडली असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

तक्रारी नंतर आज जिल्हा मुख्यालयातून फॉरेन्सिक लॅबची टीम दाखल झाली होती. या टीमने पाहणी केली असून गतप्राण झालेल्या कोळंबीचे व विषारी पदार्थाचे घटनास्थळी सापडलेले नमुने ताब्यात घेतले आहेत.

आचरा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आचरा पारवाडी डोंगरेवाडी येथील कोळंबी प्रकल्पात विषप्रयोग झाल्याचे दिसून आल्यावर प्रकल्पाचे मॅनेजिंग डायरेक्टर अपूर्व अंतोन फर्नाडीस यांनी आचरा ठाण्यात फिर्याद दिली. यात त्यांनी म्हटले आहे की, आचरा डोंगरेवाडी येथे एकूण ३० एकर जमिन में. ट्रायटोन मरीनेक्स प्रायव्हेट लिमिटेड या नावे आहे. १५ एकर कोळंबी प्रकल्पामध्ये आठ तलावे आहेत. प्रत्येक तलाव हे एक ते सव्वा एकर मध्ये आहे. सद्यस्थितीत चार तलावामध्ये कोळंबी सुरू आहे. त्याला संपूर्ण जाळीचे कम्पाऊंड आहे. कोळंबी प्रकल्पाच्या देखरेखीसाठी सहा कामगार आहेत. मी आणि माझे वडील आठवडयातुन दोनवेळा या प्रकल्पाकडे ये जा करत असतो. कोळंबी प्रकल्प शेती ही आम्ही ऑक्टोबर ते मे अखेर पर्यंत करतो. त्यानंतर पाऊसामुळे आम्ही ही शेती बंद ठेवतो. यावर्षी आम्ही शेतीमध्ये जानेवारी २०२५ मध्ये कोळंबीचे लहान लहान पिल्ले चेन्नई मधून आणून कोळंबी प्रकल्पातील डोंगरेवाडी पारवाडी खाडीबाजूकडील चार तलावामध्ये सोडले होते. आम्ही मे २०२५ च्या पहिल्या आठवड्यात सुमारे ४०० किलो पूर्ण वाढ झालेली कोळंबी काढलेली होती. उर्वरीत कोळंबी आम्ही मे महिन्याच्या अखेरीस हॉर्वसटिंग करणार होतो. १३ मे रोजी ७ वाजण्याच्या दरम्यान चार दिवसपाळीचे कामगार नेहमीप्रमाणे कोळंबीला खाद्य देवून घरी निघून गेले. त्यावेळी रात्रपाळीस असणारे कामगार हे कोळंबी प्रकल्पावर उपस्थित होते. त्यानंतर रात्री ११ वाजण्याच्या मानाने प्रकल्पामध्ये लावलेले एरियेटर हजर असलेल्या कामगाराने बंद केले. त्यानंतर ते नेहमीप्रमाणे कोळंबी प्रकल्पावर फेरी मारण्यासाठी गेले व त्यानंतर रात्री १२ वाजता प्रकल्पावरील एरियेटर पुन्हा सुरू केले. त्यावेळी आचरा पारवाडीच्या दिशेने असलेले दोन तलावातील कोळंबी पाण्यावर तरंगू लागल्याचे त्यांनी पाहीले. त्यांनी सुपरवायझर परसनजीत मचरा यास जावून कळविले. कोळंबीच्या तलावाजवळ येवून पहाणी केल्यानंतर त्यांना असे वाटले की ऑक्सिजन लेव्हल कमी झाली असावी म्हणून खाडीतील पाण्याचा पंप चालू केला. परंतु तलावातील कोळंबी मरण्यास सुरुवात झाली आणि तलावात केमिकलसारखा कसला तरी वास येवु लागल घटना मला सुपर वायझरने १४ रोजी रात्री २ वाजता फोनवरून कळविली म्हणून मी त्याला लागलीच कोळंबीची हॉर्वेस्टिंग करण्यास सांगितले व मी मुंबई येथे कामास गेलो असल्याने लागलीच मुंबईवरून आचरा पारवाडी येथे कोळंबी प्रकल्पावर दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान पोहचलो. हॉर्वेस्टिंगसाठी आलेल्यापैकी एका कामगाराला एका तलावात केमिकलने भरलेली बाटली मिळाली तलावाचे आजुबाजुला पाहणी करत असताना तलावाच्या तळाला पिठाचे गोळे दिसले व त्याला कसलातरी केमिकलसारखा वास येत होता. १३ रोजी रात्री ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने आचरा पारवाडी येथील कोळंबी प्रकल्पातील दोन तलावात कोणते तरी विषारी पदार्थ टाकून मानवी जिवीतास धोका उत्पन्न होईल अशी कृती केल्याचे दिसून येते. त्यात माझ्या दोन तलावातील कोळंबी गतप्राण होऊन कोळंबी प्रकल्पातील सुमारे ४००० किलो वजनाचे अंदाजे १८ लाख रूपये किमतीच्या कोळंबीचे नुकसान केले आहे.

दरम्यान आचरा पोलीसांनी तात्काळ पाहणी करून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी दुपारी ओरोस येथून फॉरेन्सिक लॅबची टीम दाखल झाली होती. टीमचे कमलेश सोनावणे, तनुजा रावले, आचरा पोलीस सहायक पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी देसाई, बाळू कांबळे, सुशांत पुरळकर, स्वाती आचरेकर तपासात सहभागी झाले होते.

error: Content is protected !!