फणसगाव गढीताम्हाणे पंतप्रधान ग्रामसडक रस्त्याच्या कामाचे ग्रामस्थांकडून पोलखोल

पालकमंत्र्यांच्या पीएना ग्रामस्थांकडून व्हिडिओ कॉल

पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे 4 कोटी रुपये खर्च होऊ घातलेल्या देवगड तालुक्यातील फणसगाव गढीताम्हाणे रस्त्याच्या कामातील झोल ग्रामस्थांनी उघड केला असून डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे काम हाताने उखडल्याने या ठिकाणी असलेले शाखा अभियंता पुरी व उप अभियंता भोसले हे बोगस कामामुळे उघडे पडले. दरम्यान पंतप्रधान ग्रामसडकच्या अन्य कामांची ही अनेक ठिकाणी अशी स्थिती असून याबाबत लक्ष वेधल्यानंतरही संबंधित अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घातले घालत असल्याचा आरोप ग्रामस्थातून केला जात आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या या कामांमधील दुर्लक्षामागे नेमकी कारणे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान या रस्त्याचे काम हाताने उखडून ग्रामस्थांनी या प्रश्नीं पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक श्री शेलार यांना थेट फोन द्वारे घटना कळवली. व त्यानंतर करून घेतो बघतो अशी शासकीय उत्तरे उप अभियंता भोसले यांनी दिली. त्यामुळे पंतप्रधान ग्रामसडकच्या अन्य निकृष्ट कामांंबाबतही सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत सोशल मीडियावर या रस्त्याच्या कामाचा अधिकाऱ्यांना जाब विचारतानाचा व्हिडिओ जोरात व्हायरल झाला असून, पालकमंत्री नितेश राणे या प्रश्नी काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे .


देवगड तालुक्यातील फणसगाव गढीताम्हणे या रस्त्याच्या कामाकरता सुमारे 4 कोटींचा निधी मंजूर असल्याची ग्रामस्थांनी या व्हिडिओद्वारे माहिती दिली आहे. दरम्यान या बाबत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचा आरोप केला. तसेच अधिकारी पुरी व भोसले यांच्यासमोरच हाताने डांबरीकरण केलेला रस्ता उखडून दाखवला. यावेळी अधिकाऱ्यांकडून गोंधळलेली उत्तरे दिल्यानंतर ग्रामस्थांनी प्रश्नांची सरबत्ती केली. बीबीएम वर डांबरीकरण करण्यात आले. मात्र खडीकरण केलेच नाहीअसा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यावर अधिकाऱ्यांनी परत खुलासा करण्याचा प्रयत्न केला असता ग्रामस्थांनी या रस्त्यावरून अवजड वाहतूक होते हा रस्ता किती दिवस टिकणार? असा सवाल केला. निकृष्ट काम उघड होऊन देखील तुम्ही ठेकेदाराची बाजू घेता त्यामुळे तुम्ही या कामाच्या निकृष्टपणामध्ये सहभागी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. रस्त्याचं काम सुरू असतानाच अवजड वाहतूक सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता किती दिवस टिकणार असाही सवाल ग्रामस्थांनी केला. जर काम तात्काळ काम बंद करा व ठेकेदारावर कारवाई करा तसेच निकृष्ट झालेले सर्व काम काढून पुन्हा नव्याने करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांचे श्री शेलार यांना फोन करून घडलेली घटना कथन केली. त्यावेळी श्री शेलार यांनी देखील काम सुरू असताना संबंधित खात्याचे अधिकारी कामावर हजर का नाही असा सवाल केला. तसेच निकृष्ट काम होता नये अशा देखील सूचना दिल्या. पावसाळ्यापूर्वी हा रस्ता उखडून जाणार असून वाहतूक चालू झाल्यानंतर रस्ता टिकणार नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. यावेळी भोसले यांनी कामावर कर्मचारी ठेवला होता असे सांगितले. यावेळी श्री भोसले यांनी चर्चा करत असतानाच ग्रामस्थांनी संतप्त होत आम्ही अलिबाग वरून आलो नाही असे सांगत आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी श्री शेलार यांच्याशी चर्चा करताना श्री भोसले यांनी करून घेतो, पाहणी केली असे सांगताच ग्रामस्थांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत भोसले खोटी माहिती देत आहेत. कोणतीही पाहणी केली नाही व पूर्ण रस्ता नवीन करून घ्या अशी मागणी केली. या प्रकारामुळे पंतप्रधान ग्रामसेवकच्या कामांमध्ये होत असलेल्या झोल उघड झाला असून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत हे उघड झाले आहे.. कणकवली तालुक्यातील काही कामांमध्ये असा निकृष्टपणा समोर आला असून याबाबत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्यानंतर ही त्यांच्याकडून ठेकेदाराला पाठीशी घातले जात असल्याची बाब समोर आली आहे.

error: Content is protected !!