कणकवली येथे सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान च्या पुरस्कारांचे वितरण
दीपा पवार आणि डॉ. कालिदास शिंदे यांना राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराने तर स्मिता कोदले याना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने केले सन्मानित
कणकवली : “समाजातील प्रश्न बघण्यासाठी नजर संवेदनशील बनवायला हवी. आपल्या मुलांच्या संगोपनात ती संवेदनशील कशी बनतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. आजच्या समाजात बदमाशांचा गाजावाजा होत असला तरी आपल्या आजूबाजूला दीपा पवार आणि डॉ. कालिदास शिंदे यांसारखी अनेक माणसे संघर्षमय आयुष्य जगत असतानाही असामान्यपणे मुल्यनिष्ठेने जगताना दिसतात. त्या सामान्य माणसातील मुल्यनिष्ठेमुळे आजचा समाज टिकून आहे. समाजव्यवस्थेने मुख्यधारेच्या प्रवाहापासून लांबदूर ठेवलेल्या समूहाच्या आवाजाला ‘सरस्वती लक्षण पवार साहित्य पुरस्कार’ ने सन्मानित करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.’ असे प्रतिपादन डॉ. रुपेश पाटकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून केले.
गेली काही वर्षे सिंधुदुर्गच्या साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान, कणकवली’ चा ‘सरस्वती लक्ष्मण पवार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ दीपा पवार यांच्या ‘पोलादी बाया’ आणि डॉ कालिदास शिंदे यांच्या ‘झोळी’ या आत्मकथनास तसेच ‘जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ शाळा ‘साळशी नं १ मधील सहाय्यक शिक्षिका श्रीम. स्मिता सुनील कोदले याना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
शनिवार, दि. ०१ मार्च २०२५ रोजी नगरवाचनालय सभागृह, कणकवली येथे डॉ. रुपेश पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि नरडवे हायस्कुलचे निवृत्त मुख्या श्री. आर. एस. जाधव ऍड. विलास परब, इंजि. अनिल जाधव या मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी ४.३० वाजता संपन्न झाला.
सरस्वती लक्ष्मण पवार राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचे स्वरूप पंचवीस हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे आहे तर आदर्श शिक्षक पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख रक्कम, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे.
‘लेखनासाठी काय आवश्यक असते? लेखनासाठी लेखणी नव्हे, विचार आवश्यक असतात आणि समाजाने बेदखल केलेल्या समूहाचे विचार पुढे नेण्याचं बळ अशा पुरस्कारांमुळे मिळतं.’ असं प्रतिपादन ‘पोलादी बाया’ पुस्तकाच्या लेखिका दीपा पवार यांनी केलं तर ‘ज्यांचे पोट भरलेले आहे त्यांनाच जेवणाचा आग्रह करणे आणि जो उपाशी आहे त्याला हडतूड करणे हा समाजाचा शिरस्ता असताना आमच्यासारख्या गावकुसाबाहेरील माणसांना शोधून, त्यांना सन्मानित करून व्यवस्थेला आमची दखल घ्यायला लावणाऱ्या सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानचे आपण ऋणी आहोत.’ अशी भावना झोळी या आत्मकथनाचे लेखक डॉ. कालिदास शिंदे यांनी व्यक्त केली.
‘माझ्या छोट्याशा कार्यकाळातील सेवेचा सन्मान करून सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानने पुढचा मोठा पल्ला यशस्वीपणे पार करण्याचा आणि आदर्श विद्यार्थी घडवण्याचा आत्मविश्वास दिलाय. ही जबाबदारी सक्षमपणे पेलण्याचा प्रयत्न नेहमीच राहील.’ असे प्रतिपादन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्रीम स्मिता कोदले यांनी केले.
प्रमुख मान्यवरांमध्ये निवृत्त मुख्याध्यापक श्री.आर. एस. जाधव, तसेच लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते असलेले इंजि. अनिल जाधव यांनी सदाशीव पवार गुरुजी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे आणि पुरस्कारार्थीच्या कार्याचे कौतुक करत निरोगी समाजनिर्मिती साठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज आहे असे मत व्यक्त केले.
प्रतिष्ठानच्या कार्यात नेहमीच सहकार्य करणारे कवी निलेश गावकर यांचा ग्रंथ भेट देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रतिष्ठानच्या सचिव श्रीम. शुभांगी पवार, इतर सदस्य नुपूर पवार, हरिश्चंद्र सरमळकर,राजन चव्हाण, वेदांत पवार, मैत्रेयी चव्हाण, शैलेश घाडी, तेजल परब तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील अनेक मान्यवर , सुजाण वाचक आणि चळवळीतील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सतीश पवार यांनी केले. सूत्रसंचालन सरिता पवार यांनी तर आभारप्रदर्शन संगीता पवार यांनी केले.













