कुडाळ : आ. वैभव नाईक केवळ निष्ठावंतच तर प्रामाणिक सुद्धा असल्याची प्रतिक्रिया कुडाळ तालुका सोशल मीडिया प्रमुख धिरेंद्र उर्फ गोट्या चव्हाण यांनी दिली.
आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना सोडण्यासाठी धुडकवलेल्या ऑफर आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी वाचा फोडल्याने कुठेतरी त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्या विरोधात एसीबी चौकशीचे हत्यार उपसण्यात आले. एसीबी कडून चौकशीच्या नोटीसा वर नोटीसा वैभव नाईक यांना पाठवण्यात आल्या. २००२ सालापासून त्यांनी घेतलेल्या संपत्तीची माहिती मागविण्यात आली. सुरुवातीला कणकवली शासकीय विश्रामगृह येथे त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर रत्नागिरी येथे त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले, रत्नागिरी येथील चौकशीला जाईपर्यंत पुन्हा नोटिसांचा ससेमिरा लावण्यात आला. त्यांच्या राहत्या घराची देखील मोजमापे घेऊन व्हॅल्युएशन करण्यात आले. त्यावेळी एक रुपया तरी आडमार्गाचा असेल तर फासावर लटकवा, असा इशाराच आमदार वैभव नाईक यांनी दिला. एसीबीने एवढ्यावरच न थांबता वैभव नाईक यांच्या कुटुंबातील व्यक्तींची चौकशी केली. आमदार फंड दिलेल्या सरपंचांना देखील चौकशीच्या नोटीसा देण्यात आल्या. त्यांच्याकडून फ्लॅट खरेदी केलेल्या नागरिकांनाही चौकशीच्या नोटीसा देण्यात आल्या एवढ्या खालच्या थराचे राजकारण करण्यात आले. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी माझी चौकशी करा पण माझ्यामुळे जनतेला त्रास देऊ नका असे ठणकावून सांगितले. सूडबुद्धीने केल्या जाणाऱ्या एसीबी चौकशीच्या विरोधात जनतेने आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी खंबीरपणे राहत कुडाळ येथील एसीबी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. मोठा जनसमुदाय या मोर्चात सहभागी झाला होता. खा. अरविंद सावंत, आ. भास्कर जाधव यांनी या मोर्चाचे नेतृत्व करत एसीबी कारवाईचा निषेध केला. एवढा प्रकार होऊन देखील चौकशी अंती काहीच निष्पन्न झाले नाही. वैभव नाईक निष्ठेचे पाईक यासोबतच प्रामाणिकपणाचे देखील पालन करणाऱे आहेत अशी प्रतिक्रिया कुडाळ तालुका सोशल मीडिया प्रमुख धिरेंद्र उर्फ गोट्या चव्हाण यांनी दिली.













