तब्बल ४२ केंद्रांवर कॉपीचे प्रकार उघडकीस
मुंबई : राज्यात आजपासून १२ वीच्या बोर्ड परीक्षा चालू झाल्या आहेत.दरम्यान कॉपी मुक्त दहावी बारावीच्या परीक्षांसाठी शिक्षण विभागाने कडेकोट बंदोबस्त केला होता.मात्र कॉपी मुक्त अभियानाच्या या संकल्पनेचे बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी हाती अपयश आल्याचे समोर आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रांवर कॉपीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. याप्रकरणी, भरारी पथकाने नोंद घेत संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारकडून यंदा 12 वी बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यासाठीचे अभियान जोमाने चालवले जात आहे. त्यासाठी, विशेष प्रयत्न केले जात असून स्वत: शिक्षण राज्यमंत्र्यांनी देखील आज बुलढाण्यातली एका परीक्षा केंद्रावर धाड टाकून पाहणी केली. यावेळी, कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी सरकार गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, 12 वीच्या पहिल्याच पेपर दिवशी 42 ठिकाणी कॉपी केल्याचा गैरप्रकार समोर आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक कॉपीचे प्रकार हे छत्रपती संभाजी नगरमध्ये उघडकीस आले असून 26 केंद्रांवर याठिकाणी कॉपी प्रकरणाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, मुंबई, कोल्हापूर आणि कोकण विभागातून एकही गैरप्रकार समोर आलेला नाही. या विभागात कॉपीमुक्त अभियान पहिल्याच दिवशी 100 टक्के यशस्वी ठरल्याचे दिसून आले.
जालन्यात एक विद्यार्थी रेस्टिकेट
एका ठिकाणी शाळेच्या कंपाउंडवर चढून कॉप्या पुरवण्यात येत होत्या, तर दुसरीकडे चक्क शाळेच्या छतावर चढून कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवण्याचे काम करत होते. संबंधित प्रकार भरारी पथकाला लक्षात आल्यानंतर मंठा शहरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातला एका विद्यार्थ्यावर रेस्टीकेटची कारवाई करण्यात आली आहे. तर, इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला या भागात काही केंद्रावरती हेच दृश्य पाहायला मिळाले.













