प्रवासभाडे १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता
मुंबई: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीचे प्रवासभाडे आता १५ टक्क्यांनी (१०० रुपयात १५ रुपयांची वाढ) वाढणार आहे. तिकीट दरात वाढ करण्याच्या महामंडळाने दिलेल्या प्रस्तावावर राज्य परिवहन प्राधिकरण सकारात्मक आहे.त्यामुळे लालपरीच्या प्रवाशांना नववर्षात वाढीव दराने प्रवास करावा लागेल, हे निश्चित आहे.लालपरीतून लाडक्या बहिणींना ५० टक्क्यांच्या सवलतीत प्रवास आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, मुलींनाही सवलत असून ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना १०० टक्के सवलत आहे. ६५ ते ७४ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठांना तिकीट दरात ५० टक्के सवलत आहे. दरम्यान, खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तुलनेत लालपरीचा तिकीटदर खूपच कमी आहे.
‘ना नफा – ना तोटा’ या तत्त्वावर लालपरी सामान्यांची सेवा करीत आहे. पण, आता महामंडळाच्या ताफ्यात पुढील सहा महिन्यांत २५०० बसगाड्या दाखल होणार असून, त्या गाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च भागविण्यासाठी व महामंडळाच्या खर्च व उत्पन्नातील तूट कमी व्हावी या हेतूने १५ टक्के तिकीट दरवाढीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणास पाठविला आहे. भाडेवाढीच्या निर्णयानंतर महामंडळाच्या उत्पन्नात दररोज दोन कोटी रुपयांची भर पडणार आहे.
परिवहन महामंडळाची सद्यस्थिती
एकूण बसगाड्या : १४,०००दररोजचे प्रवासी : ५५ लाखदररोजचे सरासरी उत्पन्न : २८ कोटीभाढेवाढीनंतर वाढणारे उत्पन्न : दररोज २ कोटी