जिल्ह्यात मनाई आदेश लागू

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात विविध आंदोलने, सण, उत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (अ) ते (फ), ३७ (३) नुसार दिनांक – ०५ सप्टेंबर २०२६ रोजी ००.०१ ते दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी २४.०० वा पर्यत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी खालील कृत्य करण्यांस मनाई आदेश जारी केला आहे.

शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरीक इजा करण्यांसाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे, स्फोटक पदार्थ घेवून फिरणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची साधने बाळगणे, व्यक्तीची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे, सभ्यता अगर निती याविरुद्ध अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे,पाच पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणुका काढणे व सभा घेणे.

आदेश शासकीय कर्तव्ये व अधिकार बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना आणि लग्न, धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू राहणार नाही.

या कालावधीतील मिरवणूकांना परवानगी देण्यांचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यांस परवानगी देण्यांचे अधिकार पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्हयातील पोलीस ठाणे प्रभारी अधिका-यांस राहतील.

या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र असणार आहेत. हा आदेश दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी २४.०० वा पर्यत लागू करण्यात आला आहे.

error: Content is protected !!