जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही विकासाचा मार्ग दाखवणारे – आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी:  छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, उत्कृष्ट प्रशासन व्यवस्था आणि राष्ट्रहिताच्या धोरणांद्वारे संपूर्ण देशासमोर उत्कृष्ट  शासन व्यवस्थेचा आदर्श उभा केला आहे. त्यांनी लोकाभिमुख, न्यायनिष्ठ आणि प्रजाहितदक्ष प्रशासनाची भक्कम पायाभरणी केली. गनिमी काव्याच्या प्रभावी युद्धनीतीद्वारे त्यांनी बलाढ्य शत्रूंना पराभूत केले, तर दुसरीकडे स्वदेशी आरमार उभारून सागरी सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे राष्ट्रहित, लोककल्याण आणि दूरदृष्टीचा विचार होता. त्यांच्या विचारांचा आणि कार्यपद्धतीचा आदर्श आजही समाजाला दिशा देणारा असून त्यांच्या तत्त्वांनुसार कार्य करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार दीपक केसरकर यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी, न्यायनिष्ठ आणि प्रजाहितदक्ष स्वराज्याच्या प्रेरणादायी स्मृतींना उजाळा देणारा ‘शिवस्वराज्य दिन’ आज जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवशक राजदंड व स्वराज्य गुढीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक करून स्वराज्याची स्थापना केली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने २०२१ पासून ६ जून हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा परिषद परिसरात आयोजित कार्यक्रमात स्वराज्याच्या मूल्यांचे स्मरण करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपाध्यक्ष तुकाराम साईल, आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, समाजकल्याण सभापती रोहिता तांबे, महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा नारकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सई धुरी यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. पदाधिकारी आणि अधिकारी यांनी समन्वयाने काम केल्यास जिल्हा परिषदेला अधिक नावलौकिक मिळेल. छत्रपतींच्या विचारांवर आधारित विकास आणि जनसेवा हीच खरी मानवंदना ठरेल असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनातील लोकाभिमुख दृष्टिकोनाचा विशेष उल्लेख केला. छत्रपतींनी राज्यकारभारात लोककल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या शिकवणीनुसार समाजहित आणि जनकल्याणासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे ही प्रत्येक प्रशासकीय यंत्रणेची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत स्वराज्याच्या मूल्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्प व्यक्त केला. शिवशक राजदंड आणि स्वराज्य गुढी पूजनाने कार्यक्रमाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव लाभले. स्वराज्याच्या प्रेरणादायी वारशाचे स्मरण करत शिवस्वराज्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.

error: Content is protected !!