कणकवली : कणकवलीतील श्रीनिवास रेड्डी (वय ५३, रा. बेंगलोर – कर्नाटक) यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासानंतर अखेर तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर या तिन्ही आरोपींना कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
अटक करण्यात आलेल्यांची नावे सुभाष सुब्बारायप्पा यस (३२), नरसिंम्हा नारायण स्वामी मूर्ती (३६) आणि मधुसूदन सिद्धप्पा तोकला (५२) अशी असून तिघेही बेंगलोर (कर्नाटक) येथील रहिवासी आहेत.
या तिन्ही आरोपींना बुधवारी दुपारी सुमारास तीन वाजता कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, एलसीबी आणि कणकवली पोलिसांचे पथक अजूनही बेंगलोर येथे तळ ठोकून असून, या खून प्रकरणाशी संबंधित आणखी काही संशयितांचा शोध सुरू आहे. लवकरच आणखी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणाचा तपास तांत्रिक पुरावे, मोबाईल लोकेशन आणि संशयितांमधील संपर्क साखळीवर आधारित पद्धतीने सुरू असून, पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे.