उबाठा शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मधुरा पालव यांचा इशारा
कणकवली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर चारवेळा आमदार राहिलेल्या नीलम गोऱ्हे यांनी बेताल व बेजबाबदार वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी तीव्र निषेध करीत आहे. पुन्हा आमच्या पक्षप्रमुखांवर अशी टीका केली तर त्यांना सिंधुदुर्गात फिरू देणार नाही, असा इशारा उबाठा शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मधुरा पालव यांनी दिला.
उबाठा शिवसेना कणकवली शाखा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सौ. पालब बोलत होत्या. यावेळी उपजिल्हाप्रमुख माधवी दळवी, प्रतिक्षा साटम, तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, संजना कोलते, प्रतिभा अवसरे आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.
सौ. पालव म्हणाल्या, राज्यात सत्तेत आलेल्या ईव्हीएम सरकारमधील नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील आम्ही घडलो या परिसंवादात शिवसेना पक्ष व पक्ष प्रमुखांवर आरोप केले आहेत. मर्सिडिस गाड्या दिल्या तरच पद मिळते, अशा त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. त्यांना आम्ही प्रतिकात्मक गाडीही पाठविणार आहोत. त्यांना तुटक्या गाड्याच देणे योग्य आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मराठी माणूस घडविला. सामान्य शिवसेना कार्यकर्त्याला त्याची गुणवत्ता पाहूनच आमदार, मंत्री एवढेच काय मुख्यमंत्री पदीही बसविले. त्या कार्यकर्त्यात तशी योग्यत होती म्हणून बाळासाहेबांनी त्याला मोठं पद देऊन गौरव केला. मात्र नीलम गोऱ्हे या ठाकरेंवर मुर्खपणासारखे आरोप करीत आहेत. त्याचा तीव्र निषेध करीत आहोत. लोचटपणे त्या पश्नातून बाहेर गेल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीही त्यांनी योगदान दिले नाही. आपल्या कारकिर्दीत त्यांनी कोणतीही भरीव कामगिरी केली नाही. गोऱ्हे या रत्नागिरी दौऱ्यावर आल्या होत्या, त्यावेळी त्यांना आम्ही किशोरवयीन मुलींसाठी शाळांमध्ये सुविधा देण्याची मागणी केली होती. मात्र त्यांनी संवेदनशील मागणीकडे साफ दुर्लक्ष केले.
शिवसेना पक्षात गुणवत्ता पाहूनच पद दिले जाते. नीलम गोऱ्हे या जर असा आरोप करीत असतील तर त्यांनी आतापर्यंत अशा किती मर्सिडिस दिल्या, ते त्यांनी छातीठोकपणे सांगावे. पक्षाच्या माध्यमातून मिळालेल्या पदांबाबत असा कृतघ्नपणा त्यांनी करू नये. यापुढे पुन्हा अशी बेलगाम बक्तव्ये केली तर त्यांना सिंधुदुर्गात फिरू देणार नाही, असे सौ. पालव यांनी सांगितले.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची व इतर अनेक पदे रिक्त आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञाअभावी महिलांची गैरसोय होते. याबाबतही आम्ही उपजिल्हा रुग्णालयाला भेट देणार असल्याचे सौ. पालव यांनी सांगितले.













