शालेय पोषण आहारात आता मिळणार पुलाव आणि मसाले भात?

केंद्र पुरस्कृत पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत मिळणार तब्बल 12 पाककृती

पुणे: शालेय पोषण आहारात यापूर्वी दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासंदर्भात तक्रारी आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने आहार पद्धतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार नव्याने 12 पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना संरचित आहार मिळण्यास मदत होणार आहे. व्हिजिटेबल पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, मुगडाळ खिचडीसह अन्य विविध मेनू आहारात असणार आहेत. केंद्र पुरस्कृत पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो.

या योजनेंतर्गत पहिली ते पाचवीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार तसेच तांदळापासून बनवलेल्या पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत होता.विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात विविधता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार पध्दतीप्रमाणे पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी क्षेत्रिय स्तरावर विविध अडचणी येत असल्यामुळे या पाककृतीमध्ये सुधारणा करण्याकरता लोकप्रतिनिधी, केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे आहाराचा पुरवठा करणाऱ्या नागरी भागातील संस्था, बचत गट, योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या संघटनांची निवेदने प्राप्त झाली होती, ही निवेदने व केंद्र शासनाने निश्रित केलेला प्रतिदिन प्रती विद्यार्थी आहार खर्चाची मर्यादा विचारात घेता आहार पध्दतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते

प्रत्येक दिवशी वेगवेगळी पाककृती

दोन आठवड्यात प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या दिवसांसाठी पाककृती निश्चित केली आहे. प्रत्येक दिवशी कोणती पाककृती द्यायची याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेणार आहे.

error: Content is protected !!