वेंगुर्ले नगरपालिकेच्या इमारतीचे ऑडिट करून तातडीने उपाययोजना करा
व्यापाऱ्यांसह माजी नगराध्यक्षांनी घेतली मुख्याधिकाऱ्यांची भेट
वेंगुर्ले नगरपालिकेच्या सागररत्न फिश मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या पहिल्या मजल्यावरील व्यापारी गाळे असलेल्या मार्केटच्या बांधकाम केलेल्या जीर्ण इमारतीच्या स्लॅबचा तुकडा बुधवारी सकाळी कोसळला. या घटनेवेळी त्या भागात ग्राहक, नागरिक वा व्यापारी नसल्याने अनर्थ टळला. याबाबत व्यापाऱ्यांसह वेंगुर्त्याचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा संघटक सुनील डुबळे यांनी संताप व्यक्त केला आहे.या संदर्भात सुनील डुबळे यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन या धोकादायक स्थितीबाबत केलेल्या चर्चेवेळी मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी त्या जीर्ण इमारतीचे ऑडिट ४ ते ५ दिवसांत करून घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो. त्या ऑडिटअंती इमारतीचे काम कसे करता येईल हे निश्चित झाल्यानंतर आपण ते जास्तीत जास्त लवकर करून घेईन. तोपर्यंत धोकादायक वाटणाऱ्या भागाबाबत तात्पुरती उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनामुळे उपस्थित व्यापारी समाधानी झाले.
सुमारे २० वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीचे काम योग्य दर्जा राखून होत नसल्याची तक्रार त्यावेळी आपण केली होती, मात्र तक्रारीची दखल न घेता, इमारतीचे काम रेटून नेण्यात आले होते. त्याचे दुष्परिणाम आता भोगावे लागत आहते. या इमारतीच्या काही भिंती तसेच पिलर व बार यांनाही भेगा गेल्या आहेत. तीन महिन्यांपूर्वी काही स्लॅबचे तुकडे कोसळून खाली पडले, असे सुनील डुबळे म्हणाले. वेंगुर्त्याच्या मार्केटला मोठा इतिहास आहे. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटच्या धर्तीवर ब्रिटिशांनी विकसित केलेल्या या मार्केटमध्ये पालिकेच्या तत्कालीन कमिटी व तत्कालीन मुख्याधिकारी यांनी ढवळाढवळ केली होती. मार्केटमधील जुन्या व्यापाऱ्यांच्या भावनांचा अनादर करून विरोध असतानाही मार्केटची इमारत बांधून त्यात वाणिज्य गाळ्यांची निर्मिती केली होती. हे काम दर्जेदार होत नसल्याचे त्याकाळी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. पण, पालिकेने हे काम रेटून पूर्णत्वास नेले. या इमारतीमुळे अनेक जुन्या व्यापाऱ्यांना विस्थापित व्हावे लागले. त्याकाळी ऐन बहरात असलेला त्यांचा व्यवसाय या इमारतीमुळे पूर्णपणे बुडाला आहे. या मार्केटचे अनेक गाळे आजही व्यवसाय होत नसल्याने रिकामी आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.या इमारतीला काही वर्षातच गळतीचे ग्रहण लागल्याने मोठ्या प्रमाणात निधी खर्ची करून वॉटर प्रूफिंगचे काम करण्यात आले होते. तरीही ही गळती न थांबल्याने आधीच कमकुवत असलेल्या या इमारतीच्या स्लॅबवर वजनदार लोखंडी पिलरच्या सहाय्याने पत्र्याचे छप्पर घालण्यात आले आहे. या छपराचे वजनही इमारतीला पेलवले नाही. इमारतीचे बहुतांश पिलर व भिंतींना भेगा गेल्या आहेत.तर या इमारतीत व्यापार व्यवसाय करणारे अनेक व्यापारी जीव मुठीत घेऊनच व्यवसाय करतात, असाही आरोप श्री.डुबळे यांनी केला आहे.
बुधवारी सकाळी अचानक एका पिलरच्या स्लॅबचा तुकडा खाली कोसळला. मात्र, त्यावेळी खाली कुणी नव्हते. त्यामुळे कोणताही अनर्थ घडला नाडी. या घटनेमुळे या इमारतीत व्यवसाय करणारे व्यापारी घाबरून गेलेत. जवळपास सर्वच दुकांनाच्या भिंतींना तसेच तेथील पिलर व छपराच्या बारांना भेगा गेल्या आहेत. पिलरच्या स्लॅबचे तुकडे वारंवार खाली पडू लागले आहेत, तर या गाळ्यांकडे ग्राहक कसे येणार? स्लॅबचे तुकडे पडून कोणी जखमी झाले, तर त्याच्या जीविताची काळजी कोण घेणार, अशी विचारणा व्यापाऱ्यांकडून करण्यात आली. या घटनेची माहिती व्यापाऱ्यांनी माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे यांना देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.
कोकणचा तडाखा न्यूज):-ही इमारत सुमारे २० वर्षांतच अतिशय जीर्ण झाली आहे. दुरुस्ती करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे यांनी व्यापारी संदीप गावडे, जयेश गावडे, हरेश कोरगावकर, श्रीपाद सामंत, अभी कांबळी व प्रभाकर पडते यांच्या शिष्टमंडळासह भेट घेऊन वस्तूस्थितीची कल्पना दिली. त्यावेळी या इमारतीचे ऑडिट करूनच तेथे उपाययोजनासाठी आपण ४ ते ५ दिवसांत प्रयत्न करतो. ऑडिट नंतर इमारतीचे काम कसे करावे, याची निश्चिती करून लवकर काम करून घेतले जाईल. तोपर्यंत तुकडे खाली पडत असलेल्या स्लॅबच्या ठिकाणी तात्पुरती उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.













