मंत्री उदय सामंत यांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना सूचना
पुणे: शिवसेना ठाकरे गटातील पुण्यातील पाच नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र प्रवेश करता करताच त्यांनी शिवसेनेवर टीका केली त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात आता उमटू लागले आहेत.दरम्यान ‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये आलेल्या पाच माजी नगरसेवकांची तोंडे बंद करावीत,’ अशी सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी केली.
माजी नगरसेवक काय म्हणाले?
‘खरी शिवसेना ही ठाकरेंची असून, एकनाथ शिंदेंची शिवसेना ही व्यक्तीकेंद्रित आहे. त्यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे,’ असे विधान या माजी नगरसेवकांनी केले आहे. याबाबत सामंत यांना विचारले असता त्यांनी प्रत्युत्तर दिले.
उदय सामंत काय म्हणाले?
उदय सामंत म्हणाले, ‘भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष महायुतीचा धर्म पाळून राज्यात काम करीत आहेत. त्यामुळे शिवसेनेने भाजप, ‘राष्ट्रवादी’वर अशा प्रकारे टीका केली नाही. मात्र, दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये येऊन शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना याचा अधिकार नाही.टीका करणाऱ्यांनी भविष्यात नगरसेवक होण्यासाठी निवडणुकीत तिकीट मिळते का, याचा विचार करावा. तिकीट मिळाले, तर निवडून येतील का, याचेही आत्मचिंतन करावे. अनावश्यक टीका करू नये, यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशांचे तोंडे बंद करावीत,’ असेही सामंत यांनी सांगितले.
दरम्यान याचे पडसाद आता आगामी निवडणुकांवर नक्कीच उमटणार आहेत.महायुतीमध्ये येणाऱ्या निवडणुकीत निवडून येण्यासाठीची रस्सीखेच आतापासूनच सुरू झालेली असून ही त्यांच्यातील अंतर्गत धुसफूस आता दिसून येत आहे.