सत्यशोधक विद्यार्थी संघटना आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत काशिनाथ वर्देकर द्वितीय

कणकवली : सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र (धुळे)आयोजित २६ नोव्हेंबर संविधान दिन व २८ नोव्हेंबर २०२४ महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन निमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत खुल्या गटात जि. प. पू. प्रा. शाळा नाटळ खांदारवाडी, ता. कणकवली येथे कौशल्य विकास प्रशिक्षणार्थी काशिनाथ वर्देकर रा. हरकुळ बुद्रुक ता. कणकवली यांनी द्वितीय क्रमांक पटकवला. त्यांनी “सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक चळवळीतील योगदान” या विषयावर अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. ०३ जानेवारी, २०२५ सावित्रीआई फुले जयंतीचे औचित्य साधत आभासी प्रणाली द्वारे मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला.

या समारंभासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी इतिहास विभागप्रमुख व ज्येष्ठ अभ्यासक डॉ. उमेश बगाडे व सत्यशोधक डेमोक्रेटीक पार्टीचे सचिव कॉ. सिद्धार्थ जगदेव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी निबंध स्पर्धा हेतू आणि वैचारिक चळवळ भूमिका विवेचन करताना करताना डॉ. बगाडे म्हणाले, “जगण्याच्या प्रवाहात चिकित्सा करण्याच्या तऱ्हा भिन्न स्वरूपाच्या असतात, निबंध स्पर्धेतील विशिष्ट विषयावर सखोल विचार व्यक्त करण्यासाठी वाचन, आकलन, चिकित्सा, चिंतन ची गरज पूर्ण करून लिहिणारे व्यक्त होतात. निबंध स्पर्धेतून प्रत्येक स्पर्धक स्व बोधाच्या जाणीवेतून व्यक्त झालाय, याबद्दल सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले.”

कॉ. सिद्धार्थ जगदेव म्हणाले “सत्यशोधक विद्यार्थी संघटना गेली ४० दशके विद्यार्थी जडणघडणं आणि न्याय हक्कासाठी काम करत, सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक लढे उभे करत आलीय निबंध स्पर्धा निमित्त विचारी माणसांना जोडता आले याचा आनंद आहे.”

या समारंभाचे प्रास्ताविक माजी राज्य सचिव विकास मोरे यांनी, परिचय जयेश पठाडे यांनी, आभार दीपाली भालेराव, निवेदन राज्य सचिव तुषार सूर्यवंशी यांनी केले. प्रा. भूषणधनगर, विजय वाघ, वर्षा बढे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. ही स्पर्धा राज्यस्तरीय असून खुल्या गटासाठी पाच विभागामध्ये क्रमांक काढण्यात आले. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील यशाबद्दल श्री. वर्देकर यांना मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, शुभचिंतक यांचेकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

error: Content is protected !!