ब्युरो न्युज : यावर्षी विधिमंडळात एक वेगळाच योगायोग पाहायला मिळणार आहे. कारण राणे बंधू आणि सामंत बंधू या दोन बंधूंच्या जोड्या यावेळी आपल्याला विधिमंडळात एकत्र दिसणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही बंधूंच्या जोड्या कोकणातील असून महायुतीकडून विजयी झाल्या आहेत.
विजयाची हॅट्रीक थोडक्यात हुकली
कुडाळ – मालवण मतदार संघातून शिवसेनेकडून निलेश राणे हे आमदार असून यावेळी ते पहिल्यांदाच विधिमंडळात जाणार आहेत. ठाकरे सेनेचे उमेदवार वैभव नाईक यांचा पराभव करून १० वर्षांपूर्वी झालेल्या आपल्या वडिलांच्या पराभवाचा बदला घेतला. यापूर्वी आमदार वैभव नाईक सलग दोन वेळा निवडून आले असून यावेळी त्यांच्या विजयाची हॅट्रीक थोडक्यात हुकली. त्यामुळे निलेश राणे शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी दावेदार मानले जात आहेत.
कोकण पट्ट्यातून भाजपचे एकमेव आमदार
कुडाळच्या लगत असलेल्या कणकवली मतदार संघातून भाजपकडून नितेश राणे हे आमदार आहेत. या मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी होत त्यांनी आपल्या विजयाची हॅट्रिक केली आहे. हिंदुत्वाचा तरुण चेहेरा म्हणून त्यांची महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ओळख आहे. तसेच पूर्ण कोकण पट्ट्यातून ते भाजपचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे त्यांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
उदय सामंत हे सलग ५ वेळा विजयी
कणकवलीच्या लगतचा मतदारसंघ म्हणजे राजापूर मतदारसंघ. या मतदारसंघातून किरण उर्फ भैया सामंत हे शिवसेनेेचे आमदार आहेत. सलग तीन वेळा निवडून आलेले ठाकरे सेनेचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव करत त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. राजापूरच्या लगत असलेला मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी मतदारसंघ. या मतदारसंघातून उदय सामंत हे सलग ५ वेळा विजयी झाले असून त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद देखील भूषविले आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळणं हे देखील जवळपास निश्चित आहे. विशेष बाब म्हणजे कुडाळ, कणकवली, राजापूर आणि रत्नागिरी मतदारसंघ एकमेकांना लागून सलग एका रेषेत आहेत.
कोकणातील हे चारही आमदार मंत्रिपदासाठी दावेदार
यापूर्वी अमित देशमुख आणि धीरज देशमुख या देशमुख बंधूंची जोडी यापूर्वी आपल्याला पाहायला मिळाली होती. राणे आणि सामंत बंधूंच्या जोड्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कोकणातील हे चारही आमदार मंत्रिपदासाठी दावेदार असून त्यांना मंत्रीपद मिळाल्यास कोकणचा विकास गतिमान पद्धतीने होण्यास हातभार लागेल. आता राणे आणि सामंत बंधूंपैकी नेमके कोणाकोणाला मंत्रिपद मिळते याकडे संपूर्ण कोकणासह महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.