विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा – सुशांत नाईक
कणकवली : “NEET आणि TET परीक्षांचे पेपर वारंवार लीक होत असल्याने देशातील लाखो युवकांचे भविष्य टांगणीला लागले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे,” अशी मागणी कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केली आहे. दिल्लीत जंतरमंतरवर उपोषणास बसलेले सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे करण्यात आलेल्या एकदिवसीय उपोषणात सुशांत नाईक यांनी सहभागी होत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
या आंदोलनात कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, नगरसेवक संकेत नाईक, नगरसेवक जयेश दुमाळे, वैभव मालंडकर आदी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले, "वारंवार होणाऱ्या पेपर फुटीमुळे आज देशातील तरुणायीत मोठा आक्रोश निर्माण झाला आहे. समाजात जे काही चुकीचे चालले आहे, त्याला जाहीर विरोध करण्याचे मोठे काम सोनम वांगचुक करत आहेत. त्यांच्या मागण्या समजून घेऊन जर त्याची पूर्तता केली, तरच आपण या जनतेला न्याय मिळवून देऊ शकतो. मात्र, दुर्दैवाने या संवेदनशील आंदोलनाची सरकारने अद्याप दखल घेतलेली नाही." पुढे बोलताना पारकर म्हणाले की, "आजची युवापिढी लोकशाही वाचवण्यासाठी आणि आपले हक्क मिळवण्यासाठी स्वतःहून या आंदोलनात सहभागी होत सोनम वांगचुक यांना पाठिंबा देत आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या या उपोषणाला आमचाही पूर्ण पाठिंबा आहे."
उपनगराध्यक्ष सुशांत नाईक पुढे बोलताना म्हणाले, युरोप आणि चीनसारखे देश शिक्षणाचा पाया मजबूत करून पुढे जात आहेत, मात्र आपल्या देशात भ्रष्ट कारभारामुळे शिक्षण व्यवस्था खिळखिळी झाली आहे. देशाचे भविष्य वाचवण्यासाठी वांगचुक प्राणांची बाजी लावून लढत असतानाही सरकार आंदोलकांचा आवाज ऐकत नाही, हे देशाला हुकूमशाहीकडे नेणारे आहे.
संविधान टिकवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मिळत नाही, तोपर्यंत सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष आंदोलनाच्या माध्यमातून हा लढा तीव्र गतीने सुरूच राहील, असा इशारा यावेळी उपस्थित नेत्यांनी दिला.


Subscribe










