पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दिपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश
जिल्ह्याच्या विकासाला आणखी चालना मिळणार
मंत्री नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे आभार
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प कोकणसाठी महत्वाचा ठरला असून विकासासाठी महत्वाच्या ठरलेल्या सिंधुरत्न समृद्ध योजनेला तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.पालकमंत्री नितेश राणें व आमदार दीपक केसरकर यांच्या मुदतवाढीच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिल्यामुळे पालकमंत्र्यांनी आभार व्यक्त केले आहेत.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक साधन सामुग्रीवर आधारित पर्यटन,मत्स्यव्यवसाय व सूक्ष्म उद्योगांचा विकास करण्यासाठी सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षांसाठी सिंधुरत्न समृद्ध ही पथदर्शी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.३१ मार्च २०२५ ला या योजनेची मुदत संपली होती.या योजनेला मुदतवाढ मिळावी म्हणून पालकमंत्री नितेश राणे व आमदार केसरकर सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत होते.त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून पुढील तीन वर्षांसाठी या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.या मुदतवाढीमुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार आहे.
कृषी, फलोत्पादन, पशुधन, विकास, मत्स्यव्यवसाय, पर्यटन, ग्रामविकास, लहान बंदरांचा विकास, नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित सूक्ष्म उद्योग, कौशल्य विकास अशा विविध गोष्टी या योजनेत अंतर्भूत आहेत .त्यामुळे समस्त जिल्हावासियांचीच या योजनेला मुदतवाढ मिळावी अशी मागणी होती.पालकमंत्री नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांकडे जिल्हावासियांची ही मागणी पोचवत सातत्याने पाठपुरावा केला होता.या योजनेला आता मुदतवाढ मिळाल्याने जिल्ह्याच्या विकासाला आणखी चालना मिळणार आहे.


Subscribe









