कणकवली : जानवली येथे मुंबई गोवा महामार्गावर रविवारी सकाळी भरधाव कारने धडक देत झालेल्या अपघातात गंभीररित्या जखमी असलेल्या जानवली-सखलवाडी येथील सुहासिनी चंद्रकांत दळवी (६५) यांचे गोवा बांबोळी रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
जानवली-सखलवाडी येथुन सुहासिनी दळवी रविवारी सकाळी महामार्गालगत असलेल्या एका कार्यक्रमाला आल्या होत्या. तो कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा घरी जाण्यासाठी त्या महामार्गाजवळ आल्या होत्या. याचवेळी कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने धडक दिल्याने एका शिक्षकाचा जागीच मृत्यू तर चार महिला जखमी झाल्या होत्या. त्यामध्ये सुहासिनी दळवी यांच्या डोक्याला गंभीररित्या दुखापत झाली होती. त्यांना तातडीने उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रूग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना रविवारी मध्यरात्रीनंतर त्यांचे निधन झाले.