सावंतवाडी तालुक्यातील घटना
बिबट्याकडून शेतकऱ्याला ओढून नेण्याचा प्रयत्न
सावंतवाडी : कोंडुरा- देऊळवाडी येथे बिबट्याने चौघा शेतकऱ्यांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना आज सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. याबाबत सावंतवाडी वनविभागाचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
प्रभाकर राऊळ, सुर्यकांत सावंत, पंढरी आजगावकर, आनंद न्हावी अशी जखमींची नावे आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे रवाना करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच उप वनसंरक्षक मिलीश शर्मा मळेवाड येथे रवाना झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मळेवाड येथील प्रभाकर मुळीक यांच्या घरामागे कुत्रा व मांजराचा भक्ष करण्यासाठी बिबट्या आला होता. श्री. मुळीक यांना घराच्या मागच्या बाजूला कोणाची तरी चाहूल लागल्याने दरवाजा उघडला असता त्यांच्यासमोरच बिबट्या दिसला. यावेळी बिबट्याने मुळीक यांच्यावर हल्ला चढवत पंजाचा मारा केला. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मुळीक यांनी आरडाओरडा करताच बिबट्याने तेथून पलायन केले. यानंतर जखमी मुळीक यांना उपचारासाठी मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले.
याचदरम्यान देऊळवाडी येथील सुर्यकांत सावंत यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवत त्यांना ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी त्यांना बिबट्याच्या तावडीतून सोडवले. यावेळी त्या ग्रामस्थांमधील पंढरी आजगावकर, आनंद न्हावी यांना बिबट्याने जखमी केले. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. यानंतर वनविभागासह रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झालेत. दिवसाढवळ्या भरवस्तीत येऊन बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. श्री. मुळीक यांच्या घरामागील बागेत चारही बाजूला पावसाचे पाणी साचले असल्याने बिबट्यास पाण्यातून बागेबाहेर जाणे कठीण आहे. त्यामुळे तो बागेतच असावा, असा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी वर्तवला आहे. वनविभागने बिबट्याला जेर बंद करावे, अशी मागणी केली जात आहे.