चिन्मय श्रीराम घोगळे / सिंधुदर्पण
आजवर आपल्या कोकणात अनेक नेते होऊन गेले. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपली छाप सोडली आहे. बॅ. नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू यांनी तर आपली नावं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर कायमची कोरली आहेत. यातील काही नावं तर काळाच्या ओघात अस्पष्ट होत चालली आहेत. परंतु गेल्या ३५ वर्षात एका नेत्याचं नाव तर अधिकाधिक ठळक होत चाललं आहे ते नाव म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खा. नारायणराव राणे यांचं…
एकेकाळी बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असणारे नारायण राणे १९९० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत कणकवली – मालवण विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार बनले. तेव्हापासून आतापर्यंत ते एकच स्वप्न उराशी बाळगून आहेत ते म्हणजे कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचे. कोकणात आल्यानंतर त्यांनी वाहतूक, दळणवळण, पाणी, स्ट्रीट लाईट आदी पायाभूत सुविधा तर सुधारल्याच. पण त्यांनी भर दिला तो दरडोई उत्पन्न वाढवण्यावर…
कोकणात अनेक पेट्रोल पंप आणि हॉटेल व्यवसाय त्यांनी सुरू केले. अनेकजण म्हणतात राणे यांनी स्वतः चा फायदा करून घेतला. परंतु त्यांच्या याच व्यवसायांमुळे कित्येक कोकणी तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला. पुढचं आयुष्य चांगलं बनवायचं असेल तर त्यासाठी चांगलं शिक्षण महत्वाचं आहे. असं राणेंचं ठाम मत आहे. यासाठी त्यांनी कणकवली येथे SSPM इंजिनियरिंग कॉलेजची स्थापना केली. या कॉलेजमध्ये शिकून अनेक इंजिनियर बाहेर पडले आहेत. नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ते मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे पडवे हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून अनेकांच्या हाताला रोजगार तर मिळाला आहेच. परंतु, कोकणवासीयांना चांगली आरोग्यसेवा मिळत असून भविष्यात अनेक डॉक्टर देखील या कॉलेजमधून बाहेर पडणार आहेत.
खा. नारायण राणे यांचे नातू कु. अभिराज निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि कै. तातू सीताराम ट्रस्टच्या माध्यमातून कणकवली तालुक्यातील करंजे येथे भारतातील सर्वात मोठी अशी गोवर्धन गोशाळा उभी राहत आहे. रविवार दिनांक ११ मे २०२५ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते या गोशाळेचा उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. तब्बल ७० एकर परिसरात पसरल्या गेलेल्या या गोशाळेमध्ये गीर, साहिवाल, देवली, पांगनुर, खिल्लार, कोकण कपिला अशा विविध भारतीय वंशाच्या गाईंचे संगोपन आणि संवर्धन होणार आहे. या गाईंच्या दुधापासून दही, ताक, लस्सी, पनीर, बासुंदी अशा पदार्थांचे उत्पादन घेतले जाणार आहे. या गाईंच्या गोमुत्रांपासून औषधनिर्मिती केली जाणार असून ही औषधे भारताच्या बाहेर निर्यात केली जाणार आहेत. याशिवाय गाईच्या शेणापासून बायोगॅस निर्मिती, सेंद्रिय खत आणि रंग तयार केले जाणार आहेत.
यासोबतच शेळी – मेंढी पालन, कुक्कुटपालन प्रकल्प या ठिकाणी सुरू होणार आहे. या गोशाळेला जोडूनच भाकड गाई सांभाळण्यासाठी एक भव्य शेड उभारण्यात येणार आहे. यामाध्यमातून जिल्ह्यातील भाकड जनावरांचे संगोपन होणार आहे.
या ठिकाणी पशुपालन, दुग्धव्यवसाय, शेळी – मेंढी पालन, कुक्कुटपालन, खत निर्मिती, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आदी विषयांवर विविध चर्चासत्रे, अभ्यास शिबिरे, कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये तज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. या गोशाळेच्या माध्यमातून कोकण श्वेतक्रांतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करणार आहे. आजवर राणे यांनी कोकणातील प्रत्येक घटकाचा बारकाईने विचार केला असून या गोशाळेमुळे भविष्यात शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार आहेत.
हिंदू धर्मामध्ये गोमातेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ही गोशाळा एक धार्मिक पर्यटन स्थळ व्हावे यासाठी रहाण्याची उत्तम सोय करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांना खास कोकणातील चुलीवरचं जेवण मिळेल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. हे काम देखील महिला बचत गटाला देण्यात येणार असून यामुळे परिसरातील महिलांच्या हातांना रोजगार मिळणार आहे. यामुळे परिसरातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे.
या गोशाळेमुळे कोकणातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार असून भविष्यात छोटे- मोठे उद्योजक या गोशाळेमुळे उदयास येणार आहेत. या गोशाळेमुळे कोकण विकासाची अनेक द्वारे खुली होणार असून ही गोशाळा म्हणजे कोकण विकासाची मास्टर की म्हणावी लागेल. एकंदरीत ही गोशाळा म्हणजे एक परीस असून या परीसस्पर्शामुळे भविष्यात आपल्या कोकणाला सुवर्णदिन येणार आहेत.