आदर्श ग्राम योजनेंतर्गत ग्रामपंचायतीकडून झालेली निविदा प्रक्रिया रद्द करण्याची गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामस्थांची मागणी

ग्रामसभेचा ठराव डावलून कामांचे भुमिपुजन केल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गोळवण कुमामे डिकवल ग्रामस्थांनी वेधले जिल्हा प्रशासनाचे लक्ष

मालवण : आदर्श ग्राम योजनेंतर्गत गोळवण कुमामे डिकवल ग्रामपंचायतीकडून विकासकामांची जाहीर निविदा प्रसिद्ध करण्यात आली. मात्र निविदाबाबतची कोणतीही माहिती ग्रामस्थांना देण्यात आली नाही. तसेच ग्रामपंचायत नोटीस बोर्डावर देखील प्रसिद्ध करण्यात आली नाही, त्यामुळे सदर निविदा प्रक्रिया रद्द करण्यात यावी असे मागणी निवेदन ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, आदर्श ग्राम योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीकडून एकूण ४२ विकास कामांची जाहीर निविदा दिनांक ०७/०३/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या निविदेबाबत कोणतीही माहिती ग्रामसभेला अगर ग्रामस्थांना देण्यात आलेली नाही. सदर निविदा ही ग्रामपंचायत नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. सदर निविदा प्रक्रिया ही सरपंच व सहाय्यकारी संस्था श्री. रामेश्वर कृषी युवा मंडळ भिरवंडे यांनी संगनमताने मॅनेज करून श्री. रामेश्वर मजुर सहकारी संस्था मर्यादित नेहरूनगर या संस्थेला सर्व ४२ विकास कामे देण्यात आली. याबाबत ग्रामस्थांनी दिनांक १५/०४/२०२५ रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे तक्रार केली होती. सदर तक्रार अर्जाची तात्काळ दखल घेऊन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग यांनी सरपंच व सहाय्यकारी संस्था यांना विशेष ग्रामसभा बोलाविण्यास सांगितले. दिनांक २४/०४/२०२५ रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत सदर संशयास्पद निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करून सर्व ४२ विकास कामांची नविन निविदा प्रक्रिया करण्यात यावी असे ठरविण्यात आले व तसा ठराव घेण्यात आला.

दिनांक २७/०४/२०२५ रोजी आलेल्या श्री. पोपटराव पवार, कार्याध्यक्ष आदर्श गाव व प्रकल्प समिती महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रानुसार सदरील निविदा रद्द न करता कामे पूर्ण करावीत असे सूचित केले आहे. या पत्रातील सूचनेवर आमचा आक्षेप असून ग्रामसभेच्या ठरावाची किंमत काय याबाबत आपणाकडून खुलासा होणेस विनंती आहे. ग्रामविकासात ग्रामसभेचे स्थान सर्वोच्च असताना असा बदल कोणाला करता येतो का याचे स्पष्टीकरण मिळावे. येणाऱ्या १५ दिवसात पावसाळा चालू होण्याची शक्यता असून सदरील विकास कामे घाईगडबडीत करून घेतल्यास सदरील विकास कामे वाहून जाणार आहेत. याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील व होणाऱ्या गावाच्या रोषास संबंधित यंत्रणा जबाबदार राहील.
तरी या विषयात आपण लक्ष घालून गावाचे होणारे नुकसान थांबवावे अशी मागणी गोळवण कुमामे डिकवल ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

error: Content is protected !!