एसटी महामंडळात एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई: सरकारी सेवेत अधिकाऱ्यांची दर तीन वर्षांनी बदली ही नेहमीची प्रक्रिया असते. यामागे स्थानिक नेते किंवा प्रशासकीय यंत्रणेतील हितसंबंध टाळून पारदर्शकता राखण्याचा हेतू असतो. मात्र, काही अधिकारी राजकीय नेत्यांची मर्जी आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळवून वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी बसून राहतात. ही बाब राज्य परिवहन (एसटी) महामंडळालाही लागू आहे. याच पार्श्वभूमीवर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळात तीन वर्षांहून अधिक काळ एकाच मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

सामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय

आमदार गोपिचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील कामगार संघटनेने याबाबत आग्रही मागणी केली होती.कामगार संघटनांच्या मागणीला मिळाला प्रतिसाद –एसटी कामगार संघटनांनी कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला. या बैठकीत मंत्री सरनाईक यांनी कामगार संघटनांचे म्हणणे ऐकून घेतले आणि अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भात ठोस पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले. बैठकीला आमदार गोपिचंद पडळकर, सदाभाऊ खोत, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.यावेळी पडळकर म्हणाले, “काही अधिकारी वर्षानुवर्ष एकाच मुख्यालयात बसून ठराविक कर्मचाऱ्यांशी हितसंबंध जोडतात. यामुळे इतर सामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो आणि प्रशासनाची कार्यक्षमता ढासळते. त्यामुळे तीन वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली व्हायला हवी.” या मागणीला पाठिंबा देत सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला याचा आढावा घेऊन त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

error: Content is protected !!