कुडाळ : बॅ.नाथ पै आज असते तर महाराष्ट्र- बेळगाव प्रश्नच राहिला नसता. त्यांनी तो नक्कीच सोडवला असता.बॅ.नाथ पै यांच्या निधन काळापासून ते आजपर्यंत असलेल्या राजकीय नेतृत्वाला महाराष्ट्र बेळगाव सीमा प्रश्न सोडवता आला नाही. हे दुर्दैवच म्हणावे लागेल. त्यांच्या निधनाने मराठी भाषिकांना या प्रलंबित ज्वलंत प्रश्नामुळे आज स्वातंत्र्य मिळूनही पारतंत्र्यात आहोत का ?असे वाटत आहे. महाराष्ट्र बेळगाव सीमा प्रश्न सुटणे हीच खरी बॅ.नाथ पै यांना श्रद्धांजली ठरेल. असे प्रतिपादन बेळगाव येथील के. एल. इ. वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. माधव प्रभू यांनी केले. ते बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग व बॅ.नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने बॅ.नाथ पै यांच्या ५४ व्या पुण्यतिथी व बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्गच्या २१ व्यां वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. आपल्या पुढील मनोगता मध्ये “बॅ.नाथ पै यांचे विचार समाजासाठी आदर्शवत आहेत. एखाद्या घटनेचा त्यांचा असलेला अभ्यास आणि सर्वसामान्यांच्या सुख-दुःखाबद्दल असलेली कणव यामुळे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर बेळगाव सीमा भागातही बॅ. नाथ पै यांचे कार्य हे समाजाभिमूख होते. राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून कोकणी माणसाच्या सुखदुःखात सहभागी होणारे त्यांच्या दुःख समस्या सरकार दरबारी मांडणारे असे कोकण सुपुत्र बॅ.नाथ पै हे अनाथांचे नाथ होते. त्यांच्या नावाने आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन उमेश गाळवणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बॅ.नाथ पै शिक्षण संस्था स्थापन केली व विविध परिपूर्ण शिक्षणक्रमांमार्फत उज्वल भविष्याचा वेध घेत करत असलेले उपक्रम फार कौतुकास्पद आहेत.” डॉ. माधव प्रभू पुढे म्हणाले ,की “पुढील काळात रुग्णांना नवीन तंत्रज्ञानाने विकसित संगणकीय प्रणालीच्या विविध ॲपच्या माध्यमातून आजार होण्याच्या आधीच त्यांची लक्षणे दर्शवत आगाऊ कल्पना येणे आज शक्य आहे. ते तुम्ही शिका आणि नागरिकांना त्याविषयी प्रबोधित करा.” असा सल्ला नर्सिंग व फिजिओथेरपी विद्यार्थ्यांना त्यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमासाठी यावेळी व्यासपीठावर बॅ.नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा व बॅ.नाथ पै यांची नात श्रीमती अदिती पै, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, संस्थेच्या सीईओ अमृता गाळवणकर, नेत्ररोग तज्ञ डॉ. स्मिता प्रभू, बेळगाव माजी नगरसेविका लालन प्रभू, बॅ.नाथ पै नर्सिंग कॉलेज प्राचार्या कल्पना भंडारी, सेंट्रल स्कूल प्राचार्या चैताली बांदेकर, बीएड कॉलेज प्राचार्य परेश धावडे, फिजीओथेरपी कॉलेज प्रभारी प्राचार्य डॉ. सुरज शुक्ला, स्मिता अणावकर, वर्षा गाळवणकर आदी मान्यवर उपस्थित होते,यावेळी मान्यवरांना शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर आपल्या मनोगतामध्ये म्हणाले, की “नाथ पै यांचा आदर्श घेऊन समाजात वावरत असताना, शिक्षण संस्था चालवत असताना बॅ.नाथ पै यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक एक पैलू उलगडत जातो. मिळणाऱ्या पैशापेक्षा अशा व्यक्तिमत्त्वांचे आदर्श नेहमीच दिशादर्शक ठरतात.”
आदिती पै यांनी बॅ.नाथ पै यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडून दाखवले.
वर्षा गाळवणकर यांनी आपल्या मनोगतातून उमेश गळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या संपूर्ण वाटचालीचे तोंड भरून कौतुक केले.
सचिन वालावलकर मनोगतातून म्हणाले, की “अध्यात्म, विज्ञान, विद्वत्ता आणि विद्वान यांची सांगड जिथे घातली जाते ती म्हणजे बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग!”.
यावेळी बॅरिस्टर नाथ पै यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील खुल्या व शालेय गटातील विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या शुभ असते रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन सादर केले. प्रा. परेश धावडे यांनी प्रास्ताविक तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.मंदार जोशी यांनी केले तर मान्यवरांचे आभार प्रा. प्रणाली मयेकरी यांनी मानले.













