“येणाऱ्या काळात आपल्या राज्यात एकही कत्तलखाना ठेवणार नाही,” असे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. वक्फ बोर्डाचा वाढता हस्तक्षेप, आणि धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेवर जोरदार टीका करत त्यांनी विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले.
राणे म्हणाले, “हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर वक्फ बोर्ड दावा करत आहे. कुंभमेळ्यात देखील वक्फ बोर्ड घुसखोरी करत आहे. उद्या आळंदीसारख्या पवित्र स्थळांवरही वक्फ बोर्ड आपला दावा करेल.”
“सर्वधर्म समभाव आणि भाऊबंदकीची नाटकं ही फक्त हिंदुंकरताच आहेत. ‘सेक्युलर’ हा शब्द संविधानात नाही; तो काँग्रेसच्या नाटकाचा भाग आहे. हे हिंदू राष्ट्र आहे, आणि आता इथे फक्त हिंदूंच्या हिताचा विचार केला जाईल,” असे राणे यांनी ठामपणे सांगितले.
“आम्ही ठरवले आहे की, राज्यात एकही कत्तलखाना ठेवणार नाही. हे सरकार भगव्या रक्ताने चालवले जात आहे. आम्ही या सरकारमध्ये मान वर करून वावरतोय, आणि तसंच पुढे राहणार,” असेही राणे म्हणाले.
राणे यांनी पीर बाबा आणि इतर थडग्यांवरही आक्रमक टिप्पणी केली. “मोहम्मद पैगंबर यांना मानणारेच खरे मुस्लिम आहेत; पीर बाबा वगैरे मानणाऱ्या मुस्लिमांमध्येच गोंधळ आहे. अशा थडग्यांची उखडून फेक करावी,” असे त्यांनी वक्तव्य केले.
नितेश राणे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय व धार्मिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.













