एसटी कर्मचाऱ्यांसाठी उभारणार कॅशलेस रुग्णालय

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

ठाणे: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी ठाण्यातील रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात बोलताना राज्य परिवहन उपक्रमातील (एसटी) कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत औषधोपचार मिळावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आगारात २५ तर, मुंबईत १०० खाटांचे कॅशलेस रुग्णालय उभारण्यात येतील.या रुग्णालयात राज्य शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेतून पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत करण्यात येतील, अशी घोषणा केली. तसेच गुजरात आणि कर्नाटकची परिवहन सेवा चांगली सुविधा देत असून त्यामुळे तिथे जाऊन पाहाणी करून आपल्या येथेही तसे बदल करण्यात येतील, असेही ते म्हणाले.राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना या उपक्रमाचे उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झाले. तसेच राज्य परिवहनच्या ठाणे विभागात दाखल झालेल्या १७ बसगाड्यांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात मंत्री सरनाईक यांनी उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

कर्मचाऱ्यांना दृष्टीदोष असल्याने अपघात

राज्य परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या माफक अपेक्षा पूर्ण केल्या तर, ते नागरिकांना अधिक चांगली सुविधा देऊ शकतील. त्यामुळे त्यांच्या विश्रांतीसाठी व्यवस्था, आंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच इतर सुविधा पुरविण्यावर भर द्यायला हवा, असे सरनाईक म्हणाले.राज्य परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांना दृष्टीदोष असल्याने अपघात होतात, असे वृत्त नुकतेच वाचले. या कर्मचाऱ्यांची घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसते. अनेक संकटांचा ते सामना करतात. मुलांचे शिक्षण आणि आई-वडिलांच्या औषधाचा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांना मोफत औषधोपचार मिळावेत, यासाठी एक योजना आणणे गरजेचे आहे. यामुळेच प्रत्येक जिल्ह्यातील आगारात २५ खाटांचे तर, मुंबईतील बोरिवली आगारात १०० खाटांचे कॅशलेस रुग्णालय उभारण्यात येतील. ठाणे शहरात गंगुबाई शिंदे आणि इंदिराबाई सरनाईक अशी दोन कॅशलेस रुग्णालय असून येथे रुग्णांवर महात्मा फुले आरोग्य योजनेतून पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. त्याचधर्तीवर एसटी आगारात उभारण्यात येणारी रुग्णालये चालविण्यात येतील, अशी घोषणा सरनाईक यांनी केली.

राज्यातील विविध आगारांची पीपीपी तत्वावर उभारणी

उपहारगृहात सवलत मिळावी…राज्य परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात ८७ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. राज्यातील विविध आगारांची पीपीपी तत्वावर उभारणी करण्यात येत आहे. याठिकाणी उपहारगृह चालविण्यासाठी घेणारे एसटी कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात जेवण किंवा खाद्य पदार्थ देण्याची सुविधा देतील, याकडे लक्ष दिले पाहिजे. प्रवाशांच्या जिवाची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची आपण काळजी घ्यायला हवी. जेणेकरून अपघातांचे प्रमाणही कमी होईल, असेही सरनाईक म्हणाले.विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांकडून संप पुकारला जातो. या संपानंतर त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला आणि मुलांकडून ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात, ते पाहून अतिशय वाईट वाटते. त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे सांभाळले पाहिजे, त्यांना सांभाळत असताना प्रवाशांना आपण सुविधा दिल्या पाहिजे. ही जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर दिली असल्याने त्या जबाबदारीचे भान ठेवून परिवहन सेवेला अजून कसे चांगले करता येईल, यासाठी प्रयत्न करेन, असेही म्हणाले.

error: Content is protected !!