सिंधुदुर्ग जिल्हा अनुसूचित जाती समाज बांधवांच्यावतीने इशारा
ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट असल्याचा आरोप
तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचाही दावा
कणकवली : मुणगे येथे बौद्ध समाजातील एका तरुणाला जात विचारून मारहाण केल्याच्या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा देवगड पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जाती समाज बांधवांच्या वतीने जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्याने पत्रकार परिषद घेत दिला.
यावेळी माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, देवगड तालुका सेवा संघाचे पदाधिकारी आनंद देवगडकर, माजी नगरसेवक गौतम खोडकर , यांनी पत्रकार परिषदेत विषय सविस्तर पणाने मांडला.
कणकवली येथे शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद झाली यावेळी महेंद्र चव्हाण, राजेंद्र चव्हाण, आनंद जाधव, सुंदर जाधव, बाळकृष्ण चव्हाण, विश्वनाथ पडेलकर, देवदत्त कदम, गौतम खुडकर, दिलीप वाडेकर, सुभाष कदम, आनंद मोरे, आनंद देवगडकर, सुशील कदम, विनोद कदम, विनायक तांबे, विनय मोरे, सूर्यकांत मोरे, विनोद मोरे, तुषार जाधव सुंदर जाधव, विनय मोरे ,विनोद मोरे, सुभाष कदम,गौतम हिंदळेकर शरद कांबळे, विनायक तांबे, आदी सह मोठा संख्येने समाज बांधव पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
श्री.अंकुश जाधव यांनी सांगितले की, कुडाळ तालुक्यातील कसाल येथील रोहित नारायण कदम हा तरुण मुणगे येथे बॅनर लावण्याचे मजुरीचे काम करत असताना काही जणांनी त्याला अडवून प्रथम जात विचारली. जात सांगितल्यानंतर त्याच्याशी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. तुम्ही खालच्या जातीचे लोक ही अशीच कामे करणार. अशा हिनवण्याच्या स्वरूपात शिवीगाळ करून आणखीन काही लोकांना बोलून घेऊन या युवकाला रोजगार म्हणून स्वीकारलेले काम करू नये म्हणून दमदाटी केली.मारहाण केली.जातिवाचक शिवीगाळ केली. आज हे कदम कुटुंब प्रचंड भीतीच्या छायेत आहेत. बॅनर लावण्याचे काम आता करण्यास त्यांना भीती वाटत आहे. त्यामुळे त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली याला जबाबदार कोण. असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असला, तरी आरोपी अद्याप मोकाट असलेल्या आरोपींना अटक करत नाहीत. पोलिसांवर राजकीय दबाव आहे की त्यांनी स्वतःच दबाव स्वतःवर निर्माण करून घेतला आहे याचे उत्तर द्यावे. तसेच पीडित कुटुंबावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.
आरोपी कोणत्याही जातीचे, पक्षाचे किंवा संघटनेचे असले तरी कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. तपासाची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही अटक का होत नाही, याचे उत्तर पोलीस प्रशासनाने द्यावे. या प्रकरणात आवश्यक ती सर्व कलमे लावून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. मागणी मान्य न झाल्यास समाजाच्या वतीने देवगड पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी पीडित रोहित कदम यानेही आपली भूमिका मांडत, कामावर असताना काही जणांनी नाव व जात विचारून जातीवाचक शिवीगाळ केली, मारहाण केली तसेच मोबाईलची तोडफोड केल्याचा आरोप त्याने केला.


Subscribe










