शिक्षक भरती ‘जिल्हा संवर्ग’ करून स्थानिकांना प्राधान्य द्या: आ. प्रमोद जठार

मुंबई : राज्यातील शिक्षकांची भरती राज्य स्तरावर न करता जिल्हा संवर्ग पद्धतीने करावी आणि स्थानिक उमेदवारांना ८० टक्के प्राधान्य द्यावे, अशी मागणी आमदार प्रमोद जठार यांनी पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत केली. ते म्हणाले, सध्या सिंधुदुर्ग- रत्नागिरीत ८० टक्के शिक्षक बाहेरील जिल्ह्यांतील असून स्थानिक तरुण रोजगारासाठी मुंबईत स्थलांतर करत असल्याचे सभागृहात निदर्शनास आणून दिले. स्थानिकांना थेट नोकरीत प्राधान्य देण्याऐवजी ‘जिल्हा संवर्ग पद्धत राबवल्यास हा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकेल आणि स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न सुटेल, असा कायदेशीर मार्गही त्यांनी सुचवला. या निर्णयामुळे गावातील शाळा खऱ्या अर्थाने भरभराटीला येतील आणि रोजगाराअभावी कोकणात बंद असलेली ८० टक्के घरे पुन्हा उघडतील, असा विश्वास व्यक्त करत शासनाने याबाबत तातडीने धोरणात्मक बदल करावा, अशी आग्रही भूमिका जठार यांनी मांडली.

error: Content is protected !!