इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

जागतिक एआय रोडमॅपचा घेतला सखोल आढावा;

महाराष्ट्रातील स्टार्टअप्सच्या कामगिरीचे मंत्री नितेश राणे यांच्याकडून कौतुक

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ या जागतिक दर्जाच्या शिखर परिषदेत राज्याचे मंत्री श्री.नितेश राणे यांनी उपस्थित राहून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील जागतिक घडामोडी, विविध देशांची धोरणे आणि भविष्यातील एआय रोडमॅप यांचा सखोल आढावा घेतला. सोमवारपासून सुरू झालेल्या या सहा दिवसीय परिषदेचे उद्घाटन माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. २० हून अधिक देशांचे प्रतिनिधी, ५०० पेक्षा अधिक जागतिक एआय तज्ज्ञ, तंत्रज्ञान उद्योजक आणि धोरणकर्ते या परिषदेत सहभागी झाले असून ही परिषद भारताच्या डिजिटल क्षमतेचे आणि नेतृत्वाचे प्रतीक ठरत आहे.

मंत्री नितेश राणे यांनी परिषदेदरम्यान महाराष्ट्र स्टॉलला भेट देऊन राज्यातील स्टार्टअप्स, संशोधन प्रकल्प आणि डिजिटल उपक्रमांची माहिती घेतली. महाराष्ट्रातील तरुण उद्योजक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवकल्पनांचा त्यांनी विशेष गौरव केला. राज्याच्या सर्वांगीण विकासात एआयचा प्रभावी वापर करण्यासाठी उद्योग, आरोग्य, शेती, मत्स्यव्यवसाय आणि प्रशासन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

गुगलच्या ‘Health AI’ सादरीकरणाला भेट

परिषदेत गुगलच्या बूथला भेट देत मंत्री राणे यांनी ‘Health AI’ मॉडेल्सचे सादरीकरण पाहिले. महाराष्ट्रस्थित स्टार्टअप @DimensionNXG यांच्या भागीदारीत विकसित करण्यात आलेल्या या मॉडेल्समुळे AIIMS सारख्या सरकारी रुग्णालयांमध्ये आरोग्यसेवा अधिक वेगवान, अचूक आणि परिणामकारक होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. मंत्री राणे यांनी ‘एक्स’ (X) पोस्ट करत म्हटले आहे की, “AI मुळे सरकारी आरोग्य व्यवस्थेत मोठी क्रांती घडू शकते, याचे प्रभावी उदाहरण येथे पाहायला मिळाले. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान निर्मितीत महाराष्ट्रातील स्टार्टअप्स आघाडीवर असल्याचे पाहून अभिमान वाटतो. ही परिषद भारताच्या डिजिटल भविष्याला नवी दिशा देणारी ठरणार आहे.” असे मंत्री नितेश राणे म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही परिषदेस उपस्थिती

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ या शिखर परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनीही सहभाग घेतला. आपल्या भाषणात त्यांनी ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांमुळे भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात भक्कम पायाभरणी केली असल्याचे सांगितले. ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ ही परिषद भारताला जागतिक एआय हब बनविण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!