ब्युरो न्युज : गेल्या १० वर्षात आमदार वैभव नाईक हे कुडाळ मालवण मतदारसंघात प्रामाणिकपणे काम करीत आहे. नागरिकांच्या सुखदुखात सहभागी होत आहेत. इतर आमदार, मंत्री यांनी गद्दारी केली मात्र आमदार वैभव नाईक हे उद्धवजींशी एकनिष्ठ राहिले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या योजना वैभव नाईक यांनी मतदारसंघात प्रभावीपणे राबविल्या आहेत. विविध योजनांमधून कोट्यवधींचा निधी त्यांनी मतदारसंघात आणला आहे. शासकीय मेडिकल कॉलेज, महिला बाल रुग्णालय, बंदर जेटी, शिवराजेश्वर मंदिर नूतनीकरण, मालवण नळपाणी योजना, विविध गावात नदीवर मोठी पुले,मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह, कुडाळ क्रीडा संकुल, धुपप्रतीबंधक बंधारे, विविध शाळा, मंदिर यांना सभामंडप, सभागृह अशी शाश्वत विकासाची कामे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झाली आहेत. भात पिकाला हमीभाव मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा दिला. पारंपारिक मच्छिमारांच्या हितासाठी ते झटत आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, दिव्यांगाना स्कूटर वाटप असे नाविन्यपूर्ण उपक्रम वैभव नाईक यांनी राबविले आहेत. शिंदे- फडणवीस सरकारने विविध कामात केलेला भ्रष्टाचार उघड झाला असून महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीचे सरकार येत असून या सरकारमध्ये आमदार वैभव नाईक मंत्री होणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरण पूरक प्रकल्प, उद्योग, रोजगार, पर्यटन यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यामुळे निष्ठावंत आमदार वैभव नाईक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन शिवसेना नेते विनायक राउत यांनी जनतेला केले आहे.













