स्वर्गाकडे जाणारा मार्ग रस्ते,रेल्वे,आणि हवाई ह्या तिन्ही बाजूंनी खडतर
सावंतवाडी: कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग. या कोकणातील विलोभनीय सौंदर्य पाहण्यासाठी कोकणात रोज हजारो पर्यटक येत असतात.या पर्यटकांसाठी आणि कोकणातील जनतेसाठी कोकणात सावंतवाडी येथे चिपी विमानतळ बांधण्यात आले. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना फक्त मनस्तापच सहन करावा लागतो याची प्रचिती देणारा प्रकार घडला आहे. पुण्यातुन सिंधुदुर्गला निघालेले विमान थेट गोव्यात पोहचले. यामुळे 45 प्रवाशांना पुन्हा सिंधुदुर्गात परत येताना त्रासदायक प्रवास करावा लागला आहे.
ही घटना 25 जानेवारी रोजी घडली. मध्यरात्री फ्लाय 91 चे विमान पुण्याहून सिंधुदुर्ग साठी निघाले होते. 45 प्रवासी या विमानातून प्रवास करत होते. 25 जानेवारी पहाटे हे विमान सिंधुदुर्गच्या चीपी विमानतळावर लँड होणार होते. मात्र, हे विमान चीपी विमानतळावर न उतरवता थेट गोव्याच्या मोपा विमानतळावर लँड करण्यात आले. यामुळे प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला.
या गोंधळामागे तांत्रिक कारण समोर आले आहे. हवामान खराब असल्याचा अंदाज आल्याने हे विमान चीपी विमानतळावर उतरवण्याएवजी गोव्याच्या दिशेने नेण्यात आले. या दरम्यान चिपी ते पुणे प्रवास करण्यासाठी प्रवासी चिपी विमानतळावर दाखल झाले होते. मात्र विमान न आल्याने प्रवासी ताटकळत थांबले. यामुळे प्रवाशांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
प्रवासात प्रवाशांचा बराच वेळ वाया
दरम्यान, चीपी विमानतळऐवजी गोव्याल्या उतरल्यानंतर या प्रवाशांना कारने मोफत सिंधुदुर्गात आणण्यात आले. मात्र, या प्रवासात प्रवाशांचा बराच वेळ वाया गेला. जलद प्रवासासाठी प्रवाशांनी विमानाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रवाशांना पुन्हा बायरोड प्रवास करावा लागल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
विकसनशील कोकणातील ट्रान्सपोर्ट सिस्टीम बळकट होण्याची गरज
दरम्यान खराब हवामानामुळे कित्तेक वेळा चीपी विमानतळावर खराब हवामानामुळे येणारी विमान रद्द होतात .तसेच अद्याप या विमानतळावर नाईट लँडिंग ची सुविधा उपलब्ध नाही.मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम,गणेश चतुर्थीला गावी येताना ज्यादा रेल्वेगाड्या असूनही खचाखच भरलेल्या ट्रेन मधून कोकणातील लोकांचा होणारा त्रासदायक प्रवास आणि आता विमानातील त्रासदायक प्रवास यामुळे अस म्हणावं लागेल की स्वर्गाकडे जाणार रस्ता नेहमीच खडतर असतो. एक गोष्ट मात्र नक्की रेल्वे,ट्रेन आणि पर्यायाने मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम यामुळे कोकणात होणाऱ्या पर्यटन व्यवसायावर याचा नक्कीच परिणाम होणार आहे.विकसनशील कोकणातील ट्रान्सपोर्ट सिस्टीम बळकट होण्याची गरज आहे .कारण कुठलाही प्रदेश असो त्याच्या विकासातील महत्वाचा दुवा म्हणजे त्या प्रदेशातील बळकट ट्रान्सपोर्ट सिस्टीम.


Subscribe








